पुणे : ‘जय जय रामकृष्ण हरी...’, ‘विठ्ठल विठ्ठल...’च्या जयघोषात भक्तिभावाने वारकरी पंढरीची वाट चालू लागतात. त्याच भक्तीरसाची अनुभूती देणारा अभंग आणि संतरचनांवर आधारित ‘नामाचा गजर’ हा सांगीतिक कार्यक्रम सलग पाचव्या वर्षीही होत आहे.
कलाश्री संगीत मंडळ व एबीआयएलतर्फे आयोजित कार्यक्रम येत्या शुक्रवारी, पाच जुलै २०१९ रोजी कोथरूड येथील एम. ई. एस. बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. कार्यक्रम सर्वांना विनामूल्य खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रसिकांना सभागृहात प्रवेश दिला जाईल.
दर वर्षी शास्त्रीय संगीताबरोबरच वारीच्या काळात वारकरी संप्रदायातील पारंपरिक संतरचना रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत असतो. त्याच अनुषंगाने दर वर्षी वारकरी संप्रदायातील गायक या कार्यक्रमातून संत रचना सादर करतात. यंदाच्या वर्षीदेखील या कार्यक्रमात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी यांचे अभंग गायन होईल, याबरोबरच प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे-साठ्ये या आपली गायनकला सादर करतील. वारकरी संप्रदायातील पं. रघुनाथ खंडाळकर यांचे वारकरी चक्री भजन अनुभविण्याची संधीही रसिक पुणेकर प्रेक्षकांना मिळणार आहे.
या वेळी कलाकारांना पांडुरंग पवार (तबला), राहुल गोळे (संवादिनी), गंभीर महाराज अवचर (पखावज), तसेच माऊली टाकळकर व अनिल भुजबळ (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सच्चिदानंद कुलकर्णी करणार आहेत.